धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय
ठाणे : अजय मगरे
पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत मोठा दिलासा दिला आहे. संबंधित व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देत, सर्व संबंधित पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
धनकवडी येथील जमिनीच्या मालकी आणि टीडीआर हक्कांबाबतचा वाद गेली २६ वर्षे न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने अखेर उषा चव्हाण यांच्या मुलगा हृदयनाथ यांच्या दाव्याला मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतरही खासगी विकासक ‘गोयल गंगा’ यांनी या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे करून घेतल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर उषा चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केले होते.
या प्रकरणी उषा चव्हाण आपल्या मुलासह ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात दाखल झाल्या होत्या. तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्यानंतर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी तत्काळ पुढाकार घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला.
शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेमार्फत झालेल्या टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित पक्ष, विकासक आणि पुणे महापालिका यांची स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधत, “कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही,” अशी ग्वाही दिली. सुनावणीवेळी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या निर्णयानंतर उषा चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले. “आनंद दिघे यांच्या कार्याचा वारसा आपण पुढे नेत आहात. माझ्या प्रश्नाची तत्काळ दखल घेतल्याने आता न्याय मिळेल, असा विश्वास वाटतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.




















