नवी मुंबई,दि,१५.( प्रतिनिधी)
कामोठे पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले जवळपास ५० मोबाईल फोन शोधून काढले आहेत. मोबाईलचा शोध (सी.ई.आय.आर)(सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या केंद्र शासनाच्या पोर्टलचा तसेच तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून सदर मुद्देमाल मिळविण्यात आला. ट्रेस झालेल्या मोबाईलमध्ये वापरण्यात येत असलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन, मोबाईल जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान महाराष्ट्रातील संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती आदी ठिकाणांहून काही मोबाईल कुरिअरद्वारे मागवून घेण्यात आले. तपासात असे आढळून आले की, चोरी झाल्यानंतर मूळ चोरटे हे मोबाईल कोणतेही बिल न देता विविध कारणे सांगून सामान्य नागरिकांना विक्री करत असत. त्यामुळे मूळ चोरट्यांपर्यंत पोहोचणे अनेकदा कठीण ठरते. सन २०२५ व २०२६ मधील उपलब्ध झालेले काही मोबाईल संबंधित फिर्यादींना परत देण्यात येत आहेत. परत करण्यात येणाऱ्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत रु. ८ लाख १३ हजार किंमतीचे आहेत. (सी.ई.आय.आर) हे केंद्र शासनाचे प्रभावी पोर्टल असून, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून (सी.ई.आय.आर) पोर्टलवर नोंदणी करावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सदर तपास मा. पोलिस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेड़कर, मा. साहयक पोलिस आयुक्त श्री. विक्रम कदम साहेब, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. ज्योती देशमुख मॅडम तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोहर पगार व पो. उपनिरीक्षक प्रतापसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई श्री. राजेंद्र इलग यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. कामोठे शहर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांनी व फिर्यादींनी कौतुक केले.




















