ग्रामस्थांचा जीव धोक्यात; किशोर तांगडे यांचे निवेदन…
पैठण, दि.२ : ( अभिजीत सोनवणे )
पैठण–पाचोड मुख्य रस्त्यावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळकरी मुले, महिला, जेष्ठ नागरिक यांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी या परिस्थितीची दखल घेऊन जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले. पैठण–पाचोड रोडवरील खालील ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
आखादवाडा – करंजखेडा फाटा,रहाटगाव – सोलनापूर फाटा,नानेगाव फाटा,दावरवाडी – नांदर फाटा, दादेगांव – हर्षी फाटा या गावांच्या वस्तीभागातून वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने अपघाताची भीती कायम असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना तांगडे यांनी सांगितले, की “ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी तडजोड मान्य नाही. मागणी वारंवार करूनही प्रशासन दिरंगाई करत आहे. एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? स्पीड ब्रेकर तातडीने बसवले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा ही तांगडे यांनी दिला.




















