उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची नियुक्ती;
शिवसेना भवनात आशीर्वाद बैठकीत जोशपूर्ण घोषणा
मुंबई, दि १५ ( प्रतिनिधी )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्या निमित्ताने मुंबईतील शिवसेना भवनात एक आशीर्वाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर कार्यकर्ते आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बाळा खेडेकर यांनी आपल्या शैलीत जोशपूर्ण भाषण करत कोकणातील शिवसेनेच्या मजबुतीबाबत आश्वस्तता दिली. “आले किती, गेले किती, संपले सगळे भरारा; पण शिवसेनेचाच राहील कायम दरारा,” अशा शब्दांत त्यांनी गद्दारांवर हल्लाबोल करत शिवसैनिकांत नवचेतना निर्माण केली.
खेडेकर म्हणाले, “मी हे पद केवळ स्वतःसाठी स्वीकारलेले नाही, तर हे संपूर्ण शिवसैनिकांचं पद आहे. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे गटप्रमुख’ ही योजना आम्ही प्रत्यक्षात राबवणार आहोत. कोकणात भगव्या झेंड्याची तोफ पुन्हा वाजवणार आहोत. शिवसेना ही बाप आहे आणि शिवसैनिक त्याचे खरे वारसदार.”
ज्येष्ठ शिवसैनिकांनी देखील खेडेकर यांना मोलाचे मार्गदर्शन देत, “शिवसेना म्हणजे निष्ठा, निर्भीडता आणि निस्वार्थ भाव” असे नमूद केले. त्यांनी आपल्या अनुभवांतून बाळा खेडेकर यांना भरभरून आशीर्वाद दिले.
बैठकीच्या अखेरीस उपस्थित शिवसैनिकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन बाळा खेडेकर यांचे स्वागत केले. उपस्थितांच्या उत्साहाने बैठक तेजस्वी झाली. कोकणातील शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात या बैठकीने झाली असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.
शिवसेनेच्या नव्या नेतृत्त्वाखाली कोकणात पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी बाळा खेडेकर सज्ज झाले असून, “शिवसैनिकांची पाठराखण हीच माझी खरी ताकद,” असे ठामपणे सांगत त्यांनी संघटनात्मक मजबुतीवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.




















