उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) –
राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. यापूर्वी हा भत्ता ४६ टक्के होता.
याशिवाय, कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर मोफत एसटी प्रवास पास देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ किंवा ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना’ यामधून एक निवडण्याचा पर्याय दिला जाईल. याशिवाय, अपघाती विमा योजनेंतर्गत, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेतन खातेदार कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत वा सेवेबाहेर दोन्ही स्थितीत अपघात झाल्यास विमा लाभ मिळणार आहे. मृत्यू वा पूर्ण अपंगत्वासाठी एक कोटी रुपये आणि अंशतः अपंगत्वासाठी ८० लाख रुपये विमा रक्कम दिली जाणार आहे.
नवीन निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सुमारे ३५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा थेट लाभ मिळणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी एसटीची सेवा अधिक सक्षम व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत, बस स्थानकांचे रूपांतर ‘बस पोर्ट’मध्ये करण्यावरही भर दिला.




















