अहिल्यानगर (चौंडी), दि.३१ (प्रतिनिधी )
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श घेऊन राज्य शासनही वंचित, गरीब, आणि महिलांच्या कल्याणासाठी झटणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी मंदिरांचे पुनरुज्जीवन, सामाजिक सुधारणा, महिलांचे सक्षमीकरण, व प्रजाहितासाठी न्यायव्यवस्था उभारली. इतक्या संपत्तीवरही त्यांनी कधी स्वतःसाठी खर्च न करता लोककल्याणासाठी खर्च केला. म्हणूनच त्या ‘लोकमाता’ ठरल्या.”
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान मराठी संस्कृतीचे जागृत स्थान असून, त्यांच्या दूरदृष्टीतून महिलांसाठी सैनिक तुकडी निर्माण केली गेली. आजही शासन त्यांच्या प्रजाहिताच्या धोरणावर काम करत आहे. याच ठिकाणी जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता.
६८१ कोटींचा चौंडी विकास आराखडा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, त्रिशताब्दी वर्षानिमित्त शासनाने चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये भव्य स्मारक, महिलांसाठी ‘आदिशक्ती’ अभियान आणि अहिल्यादेवींवर आधारित बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा समावेश आहे.
या सोहळ्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, मोनिकाताई राजळे, तसेच अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात लोकराज्यचा विशेषांक आणि अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. जिल्ह्यातील एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रकल्पही राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.




















