प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी)
वांद्रे (पूर्व) येथील त्रिरत्न बुद्ध विहार कृती समितीने विहाराच्या जागेच्या हस्तांतरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. समितीच्या वतीने निमंत्रक दामोदर गायकवाड, किसन रोकडे, आनंद कांबळे व रमेश धिवारे यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट न होऊ शकल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे वांद्रे (पूर्व) येथील त्रिरत्न बुद्ध विहारच्या जागेच्या हस्तांतरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.शिष्टमंडळाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांचीही भेट घेतली. त्यांनी या संदर्भात बौद्ध समाजातील भावना, रोष व धार्मिक अस्मितेचे महत्त्व अधोरेखित केले.
कृती समितीने स्पष्टपणे सांगितले की, बुद्ध विहाराचे पुनर्वसन हे बौद्ध समाजाच्या श्रद्धा व भावनांशी निगडित असून, शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. विहाराची जागा शासकीय वसाहतीत हस्तांतरित करून नव्याने बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर सकारात्मक भूमिका घेतली असून, दोन्ही वरिष्ठ अधिकारी लवकरच शासन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समितीचे निमंत्रक किसन रोकडे यांनी सांगितले.
कृती समितीने सर्व बौद्ध बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. समाज सजग व जागरूक राहावा, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.




















