पुणे, दि. ८ ( प्रतिनिधी )
राज्यभरात प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम केल्यास विशेषोपचार केंद्रांवरील ताण कमी होतो. त्यामुळे राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे सशक्त जाळे निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मावळ तालुक्यातील आंबी-तरंगवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात राज्य शासन महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. विमा आणि सेवा खात्री यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे. तसेच, द्वितीयस्तरीय सेवाही बळकट केल्या जात आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा निर्णय असून, मागील काही वर्षांत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात आली आहेत. मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क परतावा दिला जाणार आहे, ज्यामुळे शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता वाढणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले की, खासगी उच्च शिक्षण संस्थांची उभारणी करून त्यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांच्या कुटुंबीयांनी सात खासगी विद्यापीठे सुरू केली आहेत. गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या संस्था झटत आहेत.
पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालय हे ६०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून येथे अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. परिसरातील सामान्य नागरिकांना कमी खर्चात चांगले उपचार मिळावेत यासाठी हे रुग्णालय उभारले गेले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आतापर्यंत १२ ते १५ हजार रुग्णांवर उपचार झाले आहेत.
प्रास्ताविकात कुलपती डॉ. विजय पाटील यांनी रुग्णालयातील सुविधा आणि सेवांची माहिती दिली. रुग्णालयात आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येणार असून, परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.




















