म्हाडा लोकशाही दिनात ८ अर्जांवर सुनावणी;
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून अर्जदारांना दिलासा
मुंबई, दि.९ ( प्रतिनिधी ) म्हाडा तर्फे आज वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात बाराव्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकशाही दिनात नागरिकांच्या ८ अर्जांवर सुनावणी झाली. जयस्वाल यांनी नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठेवत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तत्परतेने घेतले.

संगणकीय सोडतीत पात्र ठरूनही सदनिका न मिळालेल्या अर्जदारास तात्काळ ताबा देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अँटॉप हिल येथील सदनिकेच्या प्रकरणात संबंधित विकासकास तात्काळ उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आणि सदनिकेचा ताबा दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत देण्याचे आदेशही दिले.
गोरेगाव येथील स्नेहदीप सोसायटीच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आणि त्यावर सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सांताक्रुझ येथील सुंदर नगरमधील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात, गृहनिर्माण संस्थेला सर्वसाधारण सभा घेऊन संमत ठराव करण्याचा सल्ला दिला गेला.गिरगाव येथील एका इमारतीच्या दुरुस्तीबाबत अर्जावर सुनावणी करताना पाईपलाइन आणि लिफ्टच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आणि हे काम देखरेख समितीच्या निरीक्षणाखाली करण्याचे ठरवले गेले.
छत्रपती संभाजी नगरमधील गाळेधारकाने व्याज माफीसाठी केलेल्या अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी कायदेशीर बाबी तपासून धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केली.
या दिवशी मुंबई मंडळाच्या ४, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाच्या ३ आणि छत्रपती संभाजी मंडळाच्या १ अर्जावर सुनावणी झाली. अर्जदारांना त्यांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय मिळाल्याचा समाधानकारक अनुभव मिळाला.




















