ट्रक थोडक्यात वाचला,नागरिकांचा प्रशासनावर संताप
कोपरगांव दि.१४ ( दिलीप गायकवाड )
अहिल्यानगर, मनमाड महामार्गावरील कोपरगावजवळील बेट नका भागात आज सकाळी एक मालवाहतूक ट्रक रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यात कोसळता कोसळता थोडक्यात बचावला. ट्रक क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या भागात याआधीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे. आजचा प्रसंग याच खड्ड्यांमुळे घडला असून भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खड्ड्यांमुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणेही मोठे आव्हान बनले आहे. याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, संबंधित ठेकेदार व शासकीय यंत्रणेने तात्काळ लक्ष घालून खड्डे बुजवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“जिवावर बेतणाऱ्या या परिस्थितीमुळे आम्ही दररोज धास्तावतो. प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी,” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.




















