मुंबई, दि. २६ : मंगेश म्हात्रे
वडाळा परिसरातील वार्ड क्रमांक १८१ मध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महालढतीची रंगत वाढली असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रभाग खुला असल्याने पुरुष पदाधिकारी अधिक उत्साहाने पुढे येत आहेत.
शिवसेना शिंदे गटातून माजी नगरसेविका पुष्पा कोळी, शाखाप्रमुख संजय रणदिवे भाजपमधून आशिष साळसकर रिपब्लिकन सेनेचे मनोज गायकवाड यांची नावे उमेदवारीसाठी समोर येत असून महायुतीच्या अंतर्गत कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग १८१ मध्ये कोरबा मिठागर, आनंदवाडी, बरकत अली नगर, आजाद मोहल्ला आणि शांतीनगर हे प्रमुख भाग येतात. सुमारे ५५ हजार मतदार असलेल्या या प्रभागात दलित – ४०%, ओबीसी – १३%, मुस्लिम – १५%, ख्रिश्चन – २%, तर खुला प्रवर्ग – ३०% असा मतदारांचा समतोल आहे. त्यामुळे विविध सामाजिक गटांना साधणारा उमेदवार देण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.
या प्रभागात सायन कोळीवाडा विधानसभेतील २२ बूथ, तर वडाळा विधानसभेतील ११ बूथ येतात. एफ-नॉर्थ विभागातील हा दोन्ही विधानसभा क्षेत्रांना जोडणारा एकमेव प्रभाग असल्याने राजकीय वजन तितकेच जास्त मानले जाते.
महापालिका निवडणूक २०१७ मध्ये या प्रभागातून काँग्रेसच्या पुष्पा कोळी यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या माधुरी ढोके आणि मनसेच्या स्नेहा हीवाळकर यांना त्यांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये कोळी यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याने प्रभाग १८१ मध्ये उमेदवार ठरवताना मोठा तिढा निर्माण झाला आहे. सामाजिक व राजकीय समीकरणे जुळवताना नेतृत्व कोणाला तिकीट देणार, यावर प्रभागातील निवडणूक समीकरणे पालटू शकतात.
वडाळ्यातील राजकारण सध्या उमेदवारीच्या चर्चांनी तापले असून, हा प्रभाग महायुतीतील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिला जात आहे.




















