म्हाडा वृक्षारोपणासाठी सज्ज
‘वन महोत्सव’ निमित्त राज्यभरात दोन लाख झाडांची लागवड
मुंबई, दि.३ ( प्रतिनिधी )
जुलै महिन्यात साजऱ्या होणाऱ्या ‘वन महोत्सव सप्ताहा’च्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) राज्यभरात दोन लाख वृक्षांचे रोपण करणार आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ५० हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. ही माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.
म्हाडा मुख्यालयात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत बोलताना जयस्वाल यांनी सांगितले की, १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत राज्यातील सर्व मंडळांमार्फत वृक्षारोपणाची व्यापक मोहीम राबवण्यात येईल. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, मुंबईतील अविकासयोग्य भूखंडांवर मियावाकी पद्धतीने शहरी जंगले उभारण्यात यावीत. ही पद्धत मर्यादित जागेत जैवविविधता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
मुंबई व कोंकण गृहनिर्माण मंडळांतील वसाहतींमध्येही वृक्षारोपणासाठी संभाव्यता अभ्यासण्याचे निर्देश देण्यात आले असून, मुंबई मंडळाने ५० हजार तर कोंकण मंडळाने २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रोपणासाठी पर्यावरणपूरक वृक्षांचीच निवड करण्यात येणार असून, त्यांच्या दीर्घकालीन देखभालीची जबाबदारी स्थानिक गृहनिर्माण संस्थांवर सोपवण्यात येणार आहे.
वृक्षारोपणासाठी लावली जाणारी सर्व झाडे जिओ टॅग केली जाणार असून, भविष्यात म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये झाडांची तोड टाळण्यासाठी पुनर्लागवड बंधनकारक करण्याचेही नियोजन आहे. प्रारंभी ही अट मुंबईसाठी लागू राहणार असून नंतर ती इतर विभागीय मंडळांमध्येही अमलात आणली जाईल.
या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत जयस्वाल म्हणाले की, वाढते प्रदूषण व जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या विभागीय मंडळांनी प्रत्येकी २५ हजार झाडांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत केले.




















