समृद्धी महामार्गाचे इगतपुरी ते आमणे (भिवंडी) मार्गाचे लोकार्पण; पर्यावरण संवर्धनासाठी १० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मुंबई, दि.५ ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकार्पणानंतर मान्यवरांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः वाहन चालवत महामार्गाची पाहणी केली.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वेगमर्यादेचे भान ठेवावे, असे आवाहन केले. “समृद्धी
महामार्ग हा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु त्याचा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वापर नागरिकांनी करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “यंदा राज्यात १० कोटी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांनंतर राज्यातील इतर प्रकल्पांनाही गती दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे (इगतपुरी ते आमणे, भिवंडी) आज थाटात लोकार्पण करण्यात आले. यानंतर संपूर्ण ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नागपूरपासून थेट मुंबईपर्यंत पूर्णपणे सुरु झाला आहे.
या अंतिम टप्प्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासात मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार असून, विशेषतः नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना याचा विशेष लाभ होणार आहे. महामार्गामुळे वाहतूक सुरळीत होणार असून उद्योग, पर्यटन आणि शेती क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे.




















