तंबाखू कंपन्यांविरोधात बेमुदत धरणे, प्रशासनाला कडक इशारा..
कोपरगाव : दिलीप गायकवाड
पवित्र गोमाता, ‘ॐ’ आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्याजी ‘पंढरपूर’ या नावाचा वापर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ‘गायछाप’ व ‘ओम पंढरपुरी’ तंबाखू कंपन्यांविरोधात कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आज बेमुदत धरणे आंदोलनाला दुसरा दिवसी सुरु आहे .माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाच्या दुसरा दिवशी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

“शासनाने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले असतानाही तंबाखूच्या पाकिटांवर गोमातेचे चित्र, ‘ॐ’ आणि ‘पंढरपूर’सारख्या पवित्र नावांचा वापर करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेची विटंबना केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, ही भूमिका आता सहन केली जाणार नाही,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. विटंबना करणाऱ्या संबंधित तंबाखू कंपन्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९, ३०२ तसेच ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्यांतर्गत तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच बाजारातील वादग्रस्त तंबाखूचा संपूर्ण साठा जप्त करण्याचे लेखी आदेश तात्काळ काढावेत, अशी मागणी करण्यात आली.
“गोमाता आणि ‘ॐ’चा अपमान करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. हा ‘करो या मरो’चा लढा आहे. शासनाने आणि प्रशासनाने त्वरित ठोस कायदेशीर कारवाई केली नाही, तर आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी तहसील प्रशासन, स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनावर राहील,” असा स्पष्ट आणि कडक इशारा आंदोलनाचे प्रमुख विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांनी दिला.




















