पैठण, दि. ६ (अभिजीत सोनवणे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सरकारच्या विस्मरणात गेलेल्या आश्वासनांना उजाळा देण्यासाठी “क्या हुआ तेरा वादा?” या जनआंदोलनाचा प्रारंभ आज पैठण येथून करण्यात आला. तहसील कार्यालयात निवेदन देऊन या आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली.
या वेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या निमित्ताने सरकारने केलेल्या अनेक घोषणा व न पुरवलेल्या वचनांची आठवण करून देण्यात आली.
शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा अभाव, विद्यार्थ्यांच्या अडचणी यांसह सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत हे आंदोलन राबवण्यात येणार आहे.
यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन पुढील काही दिवसांत राज्यभर सुरू राहणार असून विविध ठिकाणी निवेदने सादर केली जातील, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
युवासेना, महिला आघाडी, शेतकरी आघाडी यांचा या आंदोलनात सक्रीय सहभाग असून, युवानेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत यांचे मार्गदर्शन आंदोलनाला लाभत आहे.




















