मुंबई, दि. २७ : अजय मगरे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत राज्यातील शाळांसाठी नवे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती २८ नोव्हेंबर रोजी मुंबई जिल्हा भेटीवर येणार आहे. या पार्श्वभूमीवर समितीशी संबंधित प्रश्नावली आणि मतावली सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी ती tribhashasamiti.mahait.org या लिंकवर भरता येईल, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी दिली.
समितीच्या या भेटीदरम्यान सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषा क्षेत्रातील संस्था, शासकीय-अशासकीय संघटना, शिक्षक संघटना, पालक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच विविध चळवळींशी संबंधित प्रतिनिधी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे. त्रिभाषा धोरणाबाबत सर्वांकडून मते जाणून घेऊन अंतिम अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट समितीने स्पष्ट केले आहे.
राज्यात त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून आणि कशा पद्धतीने राबवायचे, यासाठी समिती संपूर्ण महाराष्ट्रातील विभागीय स्तरावर भेटी घेत आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईसाठी प्रमुख चर्चासत्राचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे करण्यात आले आहे. सकाळी १० वा. पासून अभ्यागत नोंदणी सुरू होईल तर १०:३० वा. प्रत्यक्ष संवाद सत्राला सुरुवात होईल.
याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांसाठी समिती ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहे.
त्रिभाषा धोरणावर राज्यभरातून येणाऱ्या मतांचा अभ्यास करून शैक्षणिक धोरणाचा पुढील आराखडा आखण्यात येणार आहे.




















