मुंबई, दि.२०: अजय मगरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त आणि व्यवस्थापन बाबतची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दादर विभागीय कार्यालयात पार पडली. परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर, दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आवारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे समन्वयक व रिपाइंचे मुंबई प्रदेश सचिव संजय भालेराव यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. “६ डिसेंबर हा बहुजनांसाठी दुःखाचा दिवस आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी पार्क परिसरात इतर राज्यांतील लोक साडी, कटलरी, महिलांची दागिने यांसह विविध वस्तूंची विक्री करतात. काही जण तर गार्डनमध्येही वर्षानुवर्षे आपले सामान मांडतात. ही परिस्थिती अनावश्यक गोंधळ निर्माण करते,” असे भालेराव यांनी स्पष्ट केले.
भालेराव पुढे म्हणाले की, “महापरिनिर्वाण दिनाच्या पवित्र वातावरणाला बाधा पोहोचू नये म्हणून अशा व्यापाऱ्यांना मैदानात आणि गार्डन परिसरात बसू देऊ नये. यासाठी आधीच उपाययोजना केल्या जाणे अत्यावश्यक आहे.”
सदर बैठकीस सिद्धार्थ कासारे (मुंबई अध्यक्ष – रिपाई आठवले गट), महेंद्र साळवे (उपाध्यक्ष – महापरिनिर्वाण दिन समन्वयक समिती), सरचिटणीस नागसेन कांबळे, संजय रमेश भालेराव (सचिव – रिपाई आठवले मुंबई प्रदेश), अक्षय आंबेडकर, कामगार नेते रमेश जाधव, प्रतीक कांबळे, संदेश कांबळे, सुशांत रुके, राहुल जाधव, प्रदीप कांबळे (भारतीय बौद्ध महासभा) यांसह मान्यवर उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध आणि स्वच्छ व्यवस्थापन व्हावे, यासाठी प्रशासन आणि आंबेडकरी सामाजिक संघटनांकडून ठोस उपाययोजनांचे प्रयत्न सुरू आहेत.




















