मुंबई, दि. १३ : मंगेश म्हात्रे
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात चौदावा लोकशाही दिन मोठ्या पारदर्शकतेने आणि नागरिकाभिमुखतेने पार पडला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नागरिकांच्या एकूण ९ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
या लोकशाही दिनात जयस्वाल यांनी “नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासन हेच म्हाडाचे ब्रीद असावे” असे सांगत सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ निर्णय घेतले.
यातील एक महत्त्वाचा प्रकरण म्हणजे श्रीमती सुनिता चेऊलकर यांचा अर्ज. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील संक्रमण शिबिरातील गाळा त्यांच्या आईच्या नावे असून सध्या त्यांच्या दिवंगत बहिणीचे पती तिथे राहत आहेत. त्यांनी पुनर्विवाह केल्याने श्रीमती चेऊलकर यांनी सदर गाळा आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासांत गाळा रिकामा करण्याची नोटीस बजावण्याचे आणि पोलिस बंदोबस्तात दिवाळीपूर्वी चेऊलकर यांना ताबा देण्याचे निर्देश दिले.
तसेच, स्वप्निल निकम यांच्या अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थकित भाडे वसूल करून आणि हमीपत्र घेऊन गाळ्याचा ताबा देण्याचे आदेश दिले.
शैला खंदारे यांच्या अंधेरीतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित अर्जावर मुंबई मंडळाचे भूव्यवस्थापक रेडेकर यांनी तत्काळ दखल घेऊन १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठरवली. या तत्परतेबद्दल जयस्वाल यांनी रेडेकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
आजच्या लोकशाही दिनात एकूण ९ अर्जांची सुनावणी झाली, त्यात आर आर मंडळाचे ४, कोकण मंडळाचे ३ आणि मुंबई मंडळाचे २ अर्जांचा समावेश होता.




















