“फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही; फुकाचा ताठा, नाव उबाठा!” — उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोलाही
जालना, दि. १२ : अजय मगरे
“बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, त्यामुळेच लोकसभेत आणि विधानसभेत बहुमत मिळवलं. आज माझ्यामुळेच काहींना शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतंय. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही; फुकाचा ताठा आणि नाव उबाठा!” असा झणझणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
जालना येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली होती. या वेळी भास्करराव आंबेकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जनसागरावरून उत्साहित झालेल्या शिंदे म्हणाले, “हा जनसमुदाय पाहून खात्री पटली की जालना महापालिकेवर भगवा फडकणारच!”
त्यांनी पुढे सांगितले, “अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर आणि कार्यकर्ते मैदानात उतरले, तर विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता पेटला की मागे फिरत नाही. बूथप्रमुख हाच आपला कणा आहे, आणि त्यांच्या मध्ये ‘सगळ्यात मजबूत कोण?’ अशी स्पर्धा लागली पाहिजे.”
व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, “ही बंडखोरी सत्तेसाठी नव्हती, तर राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी होती. राज्य ठप्प झालं होतं, विकास कामं बंद झाली होती, सण-उत्सव थांबले होते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘माझी काँग्रेस होऊ देणार नाही,’ पण काहींनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधलं. त्यामुळे महाराष्ट्रासाठी उठाव करावा लागला.”
ते पुढे म्हणाले, “कोणी आम्हाला दगाबाज म्हणो वा आरोप करो, आम्ही आरोपांना उत्तर देत नाही; कामातून देतो. शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज दिलं, लोकांच्या खात्यात थेट पैसे गेले. आणि काही लोक अजून फेसबुक लाईव्ह करून ‘सरकार’ चालवतात!”
यावेळी शिंदे यांनी जालन्यासाठी अनेक विकासकामांच्या घोषणाही केल्या.
जालना-नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, महात्मा फुले मार्केट, सिडको, पाणीपुरवठा आणि नगरविकास यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. झोपडपट्टीतील २.५ लाख नागरिकांना हक्कपत्र देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सभेच्या शेवटी शिंदे म्हणाले, “मी आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे. तुम्ही प्रत्येकजण एकनाथ शिंदे बनून लोकांमध्ये जा; मग भगवा फडकणारच आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही!”




















