मुंबई,दि. १२ : अजय मगरे
“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न साकार करण्याचे कार्य न्यायव्यवस्थेने सातत्याने करावे,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. मंडणगड येथे उभारण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, तसेच जिल्हा प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या इमारतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे आणि म्युरलचे अनावरण करण्यात आले. तसेच न्यायदान कक्ष आणि ग्रंथालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, “कोल्हापूर खंडपीठ आणि आता मंडणगड न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन हे माझ्या न्यायसेवेतील सर्वाधिक अभिमानाचे क्षण आहेत. अतिशय कमी वेळात ही सुंदर इमारत उभी करून महाराष्ट्र शासनाने न्यायदान व्यवस्थेच्या आधुनिकीकरणातील बांधिलकी दाखवली आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “२०१४ पासून राज्यात दीडशेहून अधिक न्यायालयीन इमारतींना मान्यता देऊन अनेक पूर्ण केल्या आहेत. मंडणगड न्यायालयामुळे चार-साडेचार लाख लोकांना स्थानिक पातळीवर न्याय मिळणार आहे. हे केवळ भवन नसून लोकन्यायाचे प्रतीक आहे.” तसेच त्यांनी चिपळूण न्यायालयासाठीची मागणी तत्काळ मंजूर करण्याची घोषणा केली आणि आंबडवे स्मारकाच्या आराखड्याला वेग देण्याचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “न्यायालय म्हणजे न्यायाचे आणि संविधानाचे मंदिर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रत्यक्ष प्रतीक म्हणजे ही नवी न्यायालयीन इमारत आहे. न्याय गावागावात पोहोचावा, हा सरन्यायाधीशांचा दूरदृष्टीपूर्ण विचार आहे.”
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की, “४० हजार लोकसंख्येच्या गावात दिवाणी व फौजदारी न्यायालय असणारे मंडणगड हे देशातील एकमेव उदाहरण आहे.” तसेच त्यांनी खेड आणि चिपळूण न्यायालयांसाठी नवीन इमारतींची मागणी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, संविधान उद्देशिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी प्रास्ताविक केले, तर वकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडे यांनी आभार मानले.




















