पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद – मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई, दि. १४ : अजय मगरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या सोसायटीअंतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांच्या इमारतींच्या जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी पुढील पाच वर्षांत एकूण ५०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, दरवर्षी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा प्रसार आणि वंचित समाजघटकांना ज्ञानाचे दालन खुले करण्यासाठी ८ जुलै १९४५ रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था उभारून सामाजिक क्रांतीचे पायाभूत कार्य केले.
या अंतर्गत मुंबईतील सिध्दार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिध्दार्थ नाईट हायस्कूल, सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सिध्दार्थ विधी महाविद्यालय, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (वडाळा) यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल, मिलिंद प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल, तसेच अजिंठा बॉईज होस्टेल आणि प्रज्ञा मुलींचे वसतिगृह या संस्थांचा समावेश आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडित शैक्षणिक स्थळांचा विकास करण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला होता. त्याच निर्णयाच्या पुढील टप्प्यात या संस्थांचा सर्वांगीण विकास, जतन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी आता ही स्वतंत्र योजना राबविण्यात येणार आहे.




















