मुंबई, दि. ९ : अजय मगरे
राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन तसेच राज्यगीत गायन अनिवार्य करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
मंत्रालयात झालेल्या सर्व शिक्षण मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहविचार बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डांच्या शाळांचे समन्वयक आणि प्राचार्य उपस्थित होते.
भुसे म्हणाले की, सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रिज मंडळाच्या शाळांमध्येही दहावीच्या गुणपत्रिकेत मराठी विषयाचा समावेश व्हावा, यासाठी संबंधित मंडळांशी पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
इंटरनॅशनल बोर्डाच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि मानव्यविद्येतील योगदानाचा समावेश व्हावा, याबाबतही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भुसे यांनी पुढे सांगितले की, दिव्यांग विद्यार्थी आणि कमी अध्ययन क्षमतेचे विद्यार्थी यांचाही सर्वसमावेशक शिक्षणात सहभाग राहील, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. तसेच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
‘शिक्षण हक्क अधिनियम’ अंतर्गत इतर मंडळांच्या शाळांमधील प्रवेशप्रक्रिया आणि शालेय शिक्षण विभागाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना देत त्यांनी “राष्ट्र प्रथम” ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावी, असेही आवाहन केले.
यावेळी मंत्री भुसे यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तसेच इतर मंडळांच्या शाळांनी मराठी माध्यम शाळांना मार्गदर्शन आणि सहकार्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
——————————–
विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची प्रक्रिया गतिमान करावी – भुसे
आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देणे शक्य आहे, यासाठी प्रशासनाने प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शालेय वेळापत्रक विचारात घेऊन ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, योग आणि स्वसंरक्षण (कराटे) यांचे प्रशिक्षण द्यावे. कामकाजाचे दिवस आणि उपलब्ध तासिका लक्षात घेऊन याचे नियोजन करावे.” भुसे यांनी पुढे सांगितले की, शालेय शिक्षण विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाने या उपक्रमाची शिस्तबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी केली जावी




















