‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ उत्साहात
पुणे, दि. ९ : अजय मगरे
“विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यामुळे केवळ पुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता, समाजाभिमुख, सर्वांगिण आणि जीवनमूल्यांवर आधारित शिक्षण द्यायला हवे. अपयशाला घाबरू नका; ते यशाच्या शिडीवरील पहिले पाऊल आहे,” असे प्रेरणादायी आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणे येथे झालेल्या आठव्या दीक्षांत समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
राज्यपाल बागडे पुढे म्हणाले, “गुरुकुल परंपरेत शिक्षण म्हणजे फक्त माहिती नव्हे, तर जीवनाचा दृष्टीकोन विकसित करण्याची प्रक्रिया होती. विद्यार्थ्यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत समाजाप्रती संवेदनशील राहावे. विद्येचे अंतिम उद्दिष्ट केवळ पदवी नव्हे, तर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करणे हेच खरे शिक्षण आहे.”
या प्रसंगी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडीचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष व उद्यमशीलता सल्लागार परिषदेचे अध्यक्ष रामानन रामनाथन, ‘ग्लास मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेले गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजचे चेअरमन सुभाष त्यागी, नारेडकोच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. बेहरा म्हणाले, “भारतीय परंपरेनुसार आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या अंतर्मनात असतो. भगवद्गीतेचा संदेश म्हणजे संतुलित आणि समाधानी जीवन. अनुभवाधारित शिक्षणाद्वारेच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल.”
रामानन रामनाथन यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या जागतिक यशाचा गौरव करत, “विद्यार्थ्यांनी संशोधन, नवकल्पना आणि प्रयोगशीलतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे,” असे सांगितले. तर स्मिता पाटील यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील संधींचा आढावा घेत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समारोपात प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून विद्यापीठाच्या भावी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सायली गणकर यांनी केले.




















