नांदर, दि. ७ : ( अभिजीत सोनवणे)
पैठण तालुक्यातील नांदर गावात सोमवारी (दि. ६) दुपारी झालेल्या दुर्दैवी घटनेत राधिका संतोष शेळके (वय २४) या विवाहितेचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांत हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधिका शेळके या दुपारी तीनच्या सुमारास स्वतःच्या शेतातील शेततळ्यात पडल्या. त्यांना तातडीने बाहेर काढून पैठण येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्या मृत असल्याचे घोषित केले.
राधिका यांचे माहेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुंदरवाडी येथे असून, त्यांच्या पश्चात तीन वर्षांची दोन जुळी मुले आहेत.
मंगळवार (दि. ७) दुपारी चार वाजता नांदर येथील स्मशानभूमीत पोलिस बंदोबस्तात त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया शांत वातावरणात पार पडली.
या वेळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी, सपोनि सचिन पंडित, फौजदार गोविंद राऊत आदी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नातेवाईकांशी संवाद साधून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया होईल, असे सांगितले.
या प्रसंगी ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने नांदर परिसरात शोककळा पसरली आहे.




















