फिनटेकच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समृद्धीचा मंत्र
मुंबई, दि. ९ : अजय मगरे
“डिजिटल क्रांतीच्या जोरावर भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करीत आहे. या प्रवासात ब्रिटन हा भारताचा नैसर्गिक भागीदार ठरेल,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केले. सर्वसामान्य नागरिकांच्या समृद्धीसाठी फिनटेकच्या तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित जागतिक फिनटेक महोत्सव २०२५ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मोदी म्हणाले, “भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित, पारदर्शक आणि शाश्वत वित्तीय व्यवस्थेचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वित्तीय क्षेत्र अधिक सक्षम आणि समावेशक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या कौशल्य, गुणवत्ता आणि नवोन्मेष क्षमतेमुळे देश जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासार्ह घटक बनला आहे.”
ते पुढे म्हणाले, “आत्मनिर्भर भारत उपक्रमामुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळाली असून, जागतिक गुंतवणूकदार भारताकडे अधिक विश्वासाने पाहत आहेत. भारताने डिजिटल तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे, जे प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक प्रदेशासाठी सुलभ व सहज उपलब्ध आहे.”
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले, “भारत आणि ब्रिटन यांच्यातील भागीदारी ही सामायिक प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात आहे. व्यापक आर्थिक आणि व्यापार करारातून (CETA) नव्या संधी निर्माण होतील. भारताची तरुणाई, ऊर्जा आणि नवोन्मेषशक्ती ब्रिटनच्या फिनटेक क्षमतेसोबत एकत्र आली, तर दोन्ही देशांच्या प्रगतीला नवे बळ मिळेल.”
ते म्हणाले, “ब्रिटन डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. तसेच जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी नवीन व्हिसा मार्ग आणि जलद परवाना प्रक्रिया सुरू केली आहे.”
या महोत्सवात जगभरातील नवोन्मेषकार, धोरणकर्ते, केंद्रीय बँकांचे प्रतिनिधी, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.




















