महाराष्ट्र शासन आणि खान अकॅडमीचा करार
मुंबई, दि. १२ : अजय मगरे
राज्य शासनाच्या शिक्षण क्षेत्रातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल,आता महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबविण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि खान अकॅडमी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयातील पायाभूत ज्ञान बळकट करणे हा आहे. राज्यातील तब्बल ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खान अकॅडमीच्या जागतिक दर्जाच्या डिजिटल शैक्षणिक सामग्रीचा समावेश केला जाणार आहे. ही सामग्री महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असून मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल.
शिक्षकांना या व्हिडिओंचा वापर करून वर्गातील अध्यापन अधिक समृद्ध करता येईल. विद्यार्थ्यांनाही शाळेत व घरच्या घरी व्हिडिओ आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल.
खान अकॅडमी आता इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विज्ञान विषयक अभ्यासक्रमाची सामग्री मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये देणार आहे. तसेच राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तयारी अभ्यासक्रम देखील उपलब्ध करण्यात आला आहे.
शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन सहायक ‘Khanmigo’ मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण अनुभव देणारे ठरेल.
हा कार्यक्रम राज्य शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या देखरेखीखाली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्यामार्फत अंमलबजावणी होईल.
या उपक्रमाचे नियोजन आणि निरीक्षण रिअल टाइम प्रोग्राम डॅशबोर्डद्वारे केले जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग, अध्ययन वेळ आणि प्रगती पारदर्शकपणे पाहता येईल.
“राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच्या भौगोलिक स्थान आणि पार्श्वभूमीची पर्वा न करता, गणित आणि विज्ञान या भविष्योन्मुख विषयांमध्ये सक्षम बनविणे हा आमचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कुतूहल आणि महत्वाकांक्षा यांसह शिकण्याची संधी मिळेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.




















