अहिल्यानगर,दि.२४(चंद्रकांत जोर्वेकर )
सोनई येथे मातंग समाजातील तरुणावर झालेल्या जातीयवादी प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने सोनई ते लोणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी दिली.
या संदर्भातील निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले असून, या पदयात्रेचे आयोजन ३० ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान करण्यात येणार आहे.
ॲड. पोळ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सोनई (ता. राहुरी) येथील समाजबंधू संजय वैरागळ याच्यावर ऐन दिवाळीच्या सणात जीवघेणा जातीय हल्ला झाला असून, घटनेनंतरही आरोपी मोकाट आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
पुढे ते म्हणाले की, अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही अशी घटना घडल्याने समाजमन संतप्त झाले आहे.
ही पदयात्रा लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲड. नितीन पोळ यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी सोनई येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. यात्रेदरम्यान गावागावात समाज बांधवांना मानसिक आधार देण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी लोणी येथे पदयात्रेचा समारोप होणार असून, पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून खालील मागण्यांचे निवेदन देण्यात येईल —
सोनई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे.
अहमदनगर जिल्हा “दलित अत्याचारग्रस्त जिल्हा” म्हणून घोषित करावा.
या पदयात्रेत लोक स्वराज्य आंदोलनासोबत समविचारी संघटना सहभागी होणार असून, जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. नितीन पोळ यांनी केले आहे.
प्रतिनिधी,चंद्रकांत दुर्वेकर




















