देवकर वस्तीतील युवकांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली
कोपरगाव, दि. २४ : दिलीप गायकवाड
कोपरगांव येथील टाकळी येथे दुपारी २ च्या सुमारास प्रगतशील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांच्या गट नं. १८० मधील ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील हा ऊस असून सुमारे एक एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.

एमएसईबीच्या पोलजवळील तारेला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेजारील निखिल देवकर यांनी उसाच्या शेतातून उठणारा मोठा जाळ पाहताच तत्काळ गजानन देवकर यांना कळवून मदत कार्य सुरू केले. काही क्षणांतच संपूर्ण देवकर वस्तीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणासाठी प्रचंड प्रयत्न केले.
त्यांच्या तत्परतेमुळे पश्चिम बाजूस असलेले मका व ऊस क्षेत्र तसेच उत्तरेच्या दिशेने असलेले सात ते आठ एकर ऊस आणि इतर शेतकऱ्यांची शेती वाचविण्यात यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते.
आग विझविण्याच्या मोहिमेत सभापती सुनीलभाऊ देवकर, मच्छिंद्र देवकर, राजकिरण देवकर, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, उपसरपंच संजयभाऊ देवकर, शाम भोकरे, प्रवीण मालकर, प्रसाद मालकर, अनिल बापूसाहेब देवकर, पांडुरंग देवकर, निखिल देवकर, गजानन देवकर, आप्पासाहेब देवकर, पिंटू देवकर, जगन्नाथ देवकर, साहिल देवकर, ओम देवकर, बापू मालकर, भाऊसाहेब देवकर, परसराम देवकर, गोरख देवकर, सतीश मालकर, राजीव बापू देवकर, बद्रीनाथ शेलार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच जवळील पेट्रोल पंपावरून पाण्याची सोय करून आग नियंत्रणात आणण्यात मोठी मदत झाली. भाजपचे बूथप्रमुख अनिल देवकर यांनीही उल्लेखनीय प्रयत्न केले.
दरम्यान, एमएसईबीचे वायरमन निकम साहेब, हुळेकर साहेब तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभागप्रमुख सुशांत आहेर साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सदर ऊस जळीताचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.




















