मुंबई, दि,१९ : अजय मगरे
केंद्र सरकारच्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आझाद मैदानात आयोजित पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये डिजिटल पुराव्यांची तरतूद नसल्याने आरोपी सुटत होते. नवीन कायद्यांमुळे पीडितांना ठराविक कालावधीत न्याय मिळणार आहे.”
राज्यातील गुन्हे सिद्धता दर २०१३ मधील नऊ टक्क्यांवरून आता ५३ टक्क्यांपर्यंत आला असून नवीन कायद्यांमुळे हा दर ९० टक्क्यांपर्यंत जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदभरती, तांत्रिक सुविधा, सायबर लॅब आणि न्याय सहाय्यक मोबाईल व्हॅन्समुळे तपास अधिक पारदर्शक झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन कायद्यांनुसार कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची सुविधा, ई-एफआयआरची उपलब्धता आणि सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण यांचा उल्लेखही त्यांनी केला.
प्रदर्शनात गुन्हा नोंदणीपासून शिक्षा होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आली आहे. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते सायं ६ खुले राहणार आहे.




















