दावरवाडी, दि.२१.अभिजीत सोनवणे
पैठण तालुक्यातील नांदर येथे १९ मार्च रोजी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह व गारपीटसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रात्रभर सुरू राहिल्याने शेतातील पिकांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
या अवकाळी पावसामुळे गहू, बाजरी, मका, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे आडवी झाल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दावरवाडी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून, पुढे काय करावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



















