कोपरगाव : दिलीप गायकवाड
राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या शेतमालाच्या हमीभावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव शेतकरी सामाजिक नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांनी केली आहे.
केंद्र सरकारने हमीभावाचे धोरण निश्चित केले असताना अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कमी दराने खरेदी करण्यात आली. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारभाव घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना चार हजारांपेक्षाही कमी दराने, तर काहींना तीन हजार रुपयांपर्यंत सोयाबीन विकावे लागले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हमीभावातील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे पाटील यांनी नमूद केले. राज्य सरकारने याबाबत तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास शेतकरी आंदोलनात्मक भूमिका घेतील, असा इशाराही मा गुरसळ पाटील त्यांनी दिला.




















