ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे,दि.१९.( अजय मगरे )
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, प्रा. ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणेकरांनी कायम शिवसेनेला साथ दिली असून शहराच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध आहे. ठाण्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असून शहरात मेट्रोसह विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. नव्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न तत्परतेने सोडवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याबद्दल त्यांनी ठाणेकरांचे आभार मानले. शिवसेनेचे संख्याबळ वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बाळ ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचे काम शिवसैनिक करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते आणि शिवसेनेला मोठे करण्यात ठाण्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत, नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना अनुभवी नगरसेवकांनी मार्गदर्शन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.




















