कोपरगाव : दिलीप गायकवाड
पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि महामार्ग सुरक्षा कृती आंदोलनाला’ अखेर मोठे यश मिळाले आहे. आंदोलनाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय ) संबंधित रस्त्याच्या नूतनीकरण व सुरक्षा कामांना मंजुरी दिल्याचे अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
‘माझं गाव माझा अभियान’चे विनय भगत व सहकाऱ्यांनी प्रशासकीय निष्क्रियतेच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले होते. वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना या आंदोलनातून व्यक्त करण्यात आल्या होत्या. या आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून महामार्गाच्या दुरुस्ती आणि सुरक्षेच्या कामांना गती देण्यात आली आहे.
नाशिक येथील प्रकल्प संचालक श्रीकांत व्ही. ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महामार्ग जानेवारी २०२६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. आंदोलकांच्या निवेदनाची दखल घेत रस्त्याचे नूतनीकरण, सुदृढीकरण आणि अपघात रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, साईबाबा कॉर्नर ते येसगाव या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली असली तरी साईबाबा कॉर्नर ते पुणतांबे फाटा हा अतिधोकादायक पट्टा अद्यापही या मंजुरीच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावर आजवर सर्वाधिक अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हा भाग नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर असला तरी तो केंद्र सरकारच्या संबंधित प्राधिकरणाच्या अखत्यारित येत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी साईबाबा कॉर्नर ते पुणतांबे फाटा या धोकादायक मार्गाचाही तातडीने समावेश करून सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ‘माझं गाव माझा अभियान’च्या आंदोलनामुळे प्रशासनाने अखेर दखल घेतल्याने परिसरातून या लढ्याचे स्वागत करण्यात येत आहे.




















