दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नवे वेळापत्रक;
एसटी व्यवस्थापनात ‘वेग’ आणि ‘नियमितता’चा नवा मंत्र — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि.१४ : अजय मगरे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधा उन्नत करण्यासाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ जाहीर केला आहे. आगारापासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट करत एसटीला “वेगवान, वक्तशीर आणि सुधारित” करण्याचा निर्धार केल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबईतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, खातेप्रमुख उपस्थित होते. दैनंदिन तीन स्तरांवर समीक्षा बैठक अनिवार्य
लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीची यंत्रणा ‘चल संस्था’ असल्याने तिचे दैनंदिन मूल्यमापन गरजेचे आहे. यासाठी दररोज सकाळी १० वाजता आगार, ११ वाजता विभाग,१२ वाजता प्रादेशिक कार्यालयात
आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली.
प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी यांची तातडीने छाननी करून तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून शालेय सहलींपर्यंत आणि आकस्मिक प्रवासी गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज ठेवण्यावर भर आहे.
चालक–वाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे;
डिझेल खर्च कमी करण्यासाठी चालकांना KPTL (किलोमीटर प्रति १० लिटर) आधारित दैनंदिन लक्ष्य.
लक्ष्यापेक्षा कमी कामगिरी असणाऱ्यांसाठी समुपदेशन, प्रशिक्षण, तसेच उन्नत प्रशिक्षणाची सोय.
महसुलाचा कणा असलेल्या तिकीट विक्रीत सुधारणा करण्यासाठी वाहकांना CPKMनुसार दैनंदिन उत्पन्नाचे स्पष्ट ध्येय.
कमी उत्पन्न असल्यास समुपदेशन, कर्तव्य बदल वा तोंडी/लेखी समज. सातत्याने कमी कामगिरी असणाऱ्यांवर विशेष लक्ष.
वेळापत्रक व्यवस्थापनात शास्त्रशुद्ध सुधारणा
एसटीचे वेळापत्रक हा त्याचा ‘आत्मा’ असल्याने आता सर्व विद्यमान वेळापत्रकांचे शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन सुरू केले आहे.
लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारी लक्षात घेऊन फेरबदल.
केवळ मध्यवर्ती कार्यालयाने मंजूर केलेल्या फेऱ्याच राबवण्याचे निर्देश.
१ जानेवारीला नवीन बसस्थानकनिहाय वेळापत्रक जाहीर केले जाईल. सोशल मीडियाद्वारे त्याची व्यापक प्रसिद्धी होणार असून ‘वक्तशीरपणा’ ही एसटीची नवी प्रतिमा निर्माण करण्याची भूमिका यातून स्पष्ट होते.
लांब व मध्यम पल्ल्याच्या बससेवांसाठी नवे मानदंड
महामंडळाने पुढील बदलांची घोषणा केली—
आरक्षणासाठी उपलब्ध बसांची संख्या वाढविणे
८० टक्क्यांपेक्षा कमी भारमान न ठेवणे.जादा प्रवासी असलेल्या दिवशी जादा फेऱ्या देणे
प्रत्येक फेरीची देखरेख ‘दत्तक’ तत्त्वावर पर्यवेक्षकांकडे
तसेच ऑनलाइन आणि मोबाईल अॅप आरक्षणाला विशेष प्रोत्साहन देण्याचे नियोजन.




















