विकासकांवर कारवाईची शक्यता — मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
मुंबई : मंगेश म्हात्रे
मुंबईतील अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या ५ ते १० वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा सखोल आढावा घेण्यात येणार असून, प्रकल्पांना गती देण्यासाठी गरज पडल्यास संबंधित विकासकांवर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत मांडली.
काळाचौकी येथील जिजामाता नगर पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात सदस्य अजय चौधरी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, “तत्कालीन पालकमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी दिलेल्या सूचनांनुसार विकासकामे झाली नसतील, तर विकासकावर कार्यवाही निश्चित आहे.” या प्रकरणी येत्या एक महिन्यात पुनश्च बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई शहरातील शेकडो जुन्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. या सर्व प्रकल्पांचा स्वतंत्र आढावा घेऊन संबंधित विकासकांना सुधारण्याची अखेरची संधी दिली जाईल. तरीही प्रकल्प मार्गी न लागल्यास विकासक बदलण्याची कार्यवाही केली जाईल, असे देसाई यांनी ठामपणे सांगितले.
या चर्चेत सदस्य जयंत पाटील, अजय चौधरी आणि मुरजी पटेल यांनीही सक्रिय सहभाग घेतला.




















