‘धारावी पुनर्विकासात वायू प्रदूषणाचे नियम धाब्यावर…
बांधकाम परवानगी रद्द करण्याचे पालिकेचे आदेश…
मुंबई, दि. २९ : मंगेश म्हात्रे
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाच्या नव भारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम माटुंगा रेल्वे कॉलनीत सुरू असून कंपनीने महापालिकेचे वायू प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसविल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करून कारवाई करण्याचे निर्देश डीआरपीला दिले आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात (डीआरपी) सुरू असलेल्या माटुंगा रेल्वे कॉलनीतील कामामुळे माटुंगा–धारावी परिसरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाविरोधात स्थानिक नागरिकांबरोबरच शिवसेनेचे धारावी समन्वयक रिडन फर्नांडो यांनीही तीव्र आक्षेप घेत कंत्राटदारावर तात्काळ ‘स्टॉप वर्क ऑर्डर’ जारी करण्याची मागणी केली आहे.
पालिका आणि मुंबई पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने रिडन यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदन दिले. “कंत्राटदार खुलेआम नियम मोडतोय… प्रशासन मात्र शांत बसले आहे. कोण देत आहे या कंत्राटदाराला विशेष सवलती?” असा सवाल रिडन यांनी उपस्थित केला आहे.
पालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी माटुंगा लेबर कॅम्प (सीटीएस २ व ३ पार्ट) येथे पाहणी केल्यानंतर दिलेल्या अहवालात, वायू प्रदूषण रोखण्यासाठी अनिवार्य असलेल्या ५ उपाययोजना पूर्णपणे गायब असल्याचे स्पष्ट झाले. या उपाययोजना पुढीलप्रमाणे :१) अँटी–स्मोक गन २) स्टोरेज रूम ३) ग्रीन नेट
४) टायर वॉशिंग सुविधा ५) एअर पॉल्युशन मॉनिटर डिस्प्ले बोर्ड.या सर्व सुविधा नसल्याचे पालिकेने अधिकृत पत्रात मान्य केले असून, हीच बाब रिडन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे.
परवानगी रद्द करा; कंत्राटदारावर त्वरित कारवाई करा” — पालिकेची सक्षम प्राधिकाऱ्यांना नोटीस…
सहाय्यक अभियंता (इ. व का.)–३, जी/उत्तर विभाग यांनी धारावी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांना पत्र पाठवून कंत्राटदारावरील परवानगी रद्द करण्याची शिफारस केली आहे.
या पत्रात स्पष्ट नमूद आहे की,
“स्थळ पाहणीत वायू प्रदूषण प्रतिबंध नियमांचे कोणतेही पालन करण्यात आलेले दिसून आले नाही. त्यामुळे या प्रकल्पाला देण्यात आलेली परवानगी रद्द करून विकासकावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.”
ही नोंद घेत तात्काळ कठोर कारवाई करावी,अशी अधिकृत मागणी पालिकेकडून करण्यात आली आहे.
धारावीकरांच्या आरोग्याचा खेळखंडोबा… परिसरातील धूळ व प्रदूषणामुळे रहिवाशांमध्ये श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ, खोकला अशा तक्रारी वाढल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळू देणार नाही. आवश्यक असल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” अशी चेतावणीही रिडन फर्नांडो यांनी दिली.
एमपीसीबी, पालिका आणि धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला दिलेल्या तक्रारीनंतर आता कंत्राटदारावर प्रत्यक्ष कारवाई केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















