राजेंद्र झावरे यांचा प्रशासनाला इशारा..
कोपरगाव, दि. ३० : दिलीप गायकवाड
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू असून, या रस्त्याने नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा तयार केला आहे. नुकताच कोपरगाव शहरातील होतकरू तरुण आदित्य देवकर याचा येवला नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त करत शिवसेना (उबाठा)चे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे की “नगर-मनमाड महामार्ग तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू!”
झावरे म्हणाले की, “नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखता येत नाही. शिवाय रस्त्यावर कोणतीही प्रकाशव्यवस्था नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या दुर्लक्षामुळेच आदित्य देवकरसारख्या तरुणाचे जीवन अकाली संपले.”
मंगळवारी रात्री साडेदहा वाजता आदित्य दुचाकीवरून प्रवास करत असताना येवला नाका येथील बजाज शोरूमसमोरील खड्ड्यात त्याची गाडी अडकल्याने तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
झावरे यांनी पुढे सांगितले की, “दरवर्षी अनेक निष्पाप प्रवाशांचे जीव या महामार्गावर जात आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन कानाडोळा करत आहे. तात्काळ कारवाई करून खड्डे बुजवावेत, तसेच महामार्गावर योग्य प्रकाशव्यवस्था उभारावी. अन्यथा आम्हाला जनतेसह उग्र आंदोलन उभारावे लागेल.”
स्थानिक नागरिकांनीही या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.




















