मुंबई दि.१५ : मंगेश म्हात्रे
प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरातील टी- ३६, ३७, ५३ आणि टी- ५४ या धोकादायक अवस्थेत आहेत. टी- ३६ या इमारतीतील रहिवाशांना म्हाडामार्फत पाठविण्यात आलेल्या ‘गाळे रिकामी करा’ नोटीसवरून संतापाची लाट उसळली आहे. या पत्रामध्ये काही रहिवाशांना “अनधिकृत/पात्र/अपात्र/घुसखोर” अशी संज्ञा वापरल्याने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
निव्वळ आठ दिवसांत गाळे रिकामे करण्याचे आदेश आणि तत्काळ स्थलांतराची सक्ती—या पद्धतीवरही नागरिकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. “आम्ही इथले पिढीजात रहिवासी आहोत. आमची कागदपत्रे, भाडे पावत्या, मतदानपत्रिका सर्व काही म्हाडाच्या नोंदीत आहेत. मग आम्ही ‘घुसखोर’ कसे?” असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
म्हाडाच्या पत्रात आयआयटी पवईच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा उल्लेख असून इमारत ‘अतिधोकादायक’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र रहिवाशांचे म्हणणे वेगळे आहे.
“ऑडिट रिपोर्ट आम्हाला दाखवला गेला नाही. आधी इमारत दुरुस्तीची संधी न देता थेट पाडकामाचा निर्णय कसा? हे पुनर्विकास नावाखालील हटवापटवीचे राजकारण आहे,” असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
म्हाडाने स्थलांतराचे ने दोन पर्याय सुचवले त्यातील
१) म्हाडा संक्रमण शिबिरातील गाळा घ्या
२) प्रतिमहा वीस हजार रुपये भाडे घ्या मात्र दोन्ही पर्याय अव्यवहार्य असल्याची टीका रहिवाशांनी केली आहे आठ दिवसांत प्रतिसाद न दिल्यास ‘निष्कासनाची कार्यवाही’ करण्याची नोटीस दिल्याने वातावरण आणखी तापले आहे.
“सरकारी संस्थेने नागरिकांना गुन्हेगार समजून वागवणे लज्जास्पद आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडणार,” असा इशारा भाजपचे स्थानिक मंडळ अध्यक्ष दत्ता केळूसकर यांनी दिला आहे.
प्रतीक्षानगरातील पुनर्वसनासाठीची ही धुसफूस आता मोठ्या संघर्षाला तोंड देणार, असे संकेत सध्या परिसरात दिसत आहेत.




















