कौशल्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांची महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई, दि.१४ : अजय मगरे
प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर आणि माध्यम क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी चार दिवसीय ‘एआय प्रशिक्षण कार्यशाळा’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.राज्यातील पत्रकारांसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
कौशल्य विकास विभागामार्फत या प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. त्याचबरोबर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ हा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही कार्यशाळा आयोजित झाली.
समारोप सोहळ्याला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, तसेचप्रिंट–इलेक्ट्रॉनिक–डिजिटल माध्यमातील पत्रकार उपस्थित होते.
‘एआय फॉर न्यूज’ डिप्लोमा सुरू करण्याचा सकारात्मक विचार
कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या,
“पत्रकारांसाठी एआय फॉर न्यूज हा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आला असून त्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. ही कार्यशाळा पत्रकारांच्या दैनंदिन कामाला अत्यंत उपयुक्त ठरेल.”
चार दिवसीय कार्यशाळेत सहभागी पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
पत्रकार दीपक कैतके, संजय जोग, क्लारा लुईस यांनी अनुभव व्यक्त करत कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
समारोप कार्यक्रमात वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आभार मानले तर सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन केले.




















