नांदगाव येथे ‘जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा’ कार्यक्रमात प्रतिपादन…
धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम..
कोपरगाव, दि.१५ : दिलीप गायकवाड
नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुका येथील जुन्या तहसिल कार्यालय परिसरात बुधवार रोजी ‘जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनोज चोपडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले की, “भारतीय संविधानाचे चार स्तंभ आहेत आणि या चार स्तंभावरच आपला देश उभा आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क सुरक्षित केले आहेत. लोकशाही जिवंत ठेवणारे हे संविधानच आपल्याला वाचवणार आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. आंबेडकर पुढे म्हणाले की, “आमच्या परिवाराची परिस्थिती गरीब होती, तरी बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेकरता अर्पण केले. त्यांनी दिलेले संविधान हे भारतीय समाजावरचे मोठे उपकार आहेत. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनीच दिला आहे,” असे ते म्हणाले.
भारतीय संविधान टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.
कार्यक्रमात नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, नगरसेवक भारत वानखेडे, राजेश कवडे, अरुण पाटील, अमित पाटील (एमव्हीपी संस्था), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, तसेच मुंबई येथील रमेश, संदेश, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज चोपडे यांनी केले, सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित जाधव, दीपक अंभोरे, मोहित भोसले, मोहसीन बेग, भुषण मराठे, पंकज जगताप, सागर अडकमोल आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
: दिलीप गायकवाड:




















