या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १ : अनंता मोटे
बीड येथील यादवकालीन कंकालेश्वर मंदिर आणि सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे महाराष्ट्राचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा असून त्यांचे संवर्धन हेरिटेज पद्धतीने, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पुण्याचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनीही सहभाग घेतला.
पवार म्हणाले, “बाराव्या शतकातील स्थापत्य वैशिष्ट्यांनी नटलेले कंकालेश्वर मंदिर हे ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्या जतन-दुरुस्तीकरिता शासनाने ९ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सरोवरातील गाळ काढणे, पदपथ-दुरुस्ती, जोत्यांचे मजबुतीकरण, गळती प्रतिबंधक योजना तसेच बाग-बगीचा विकासाची कामे हाती घेतली जातील ते पुढे म्हणाले की, “या वारशाचे संवर्धन करताना कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही. परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. कंकालेश्वर मंदिर व औंधचे संग्रहालय हे राज्याच्या सांस्कृतिक वारशातील दैदिप्यमान स्मारके असून त्यांच्या जतनासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.”




















