कोपरगाव.दि,२०( दिलीप गायकवाड )
कोपरगाव शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या शेजारी सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी विजय जाधव आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामाची काही दिवसांपूर्वी समाजसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी संतप्त समाजसेवकांनी काम तात्पुरते बंद पाडत संबंधित ठेकेदार व नगरपालिका प्रशासनाला याबाबत इशाराही दिला होता.
मात्र, त्यानंतरही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही किंवा तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आणि जनतेच्या पैशातून सुरू असलेल्या कामात होत
असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.
या आमरण उपोषणामुळे शहरातील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




















