ठाणे : अजय मगरे
वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर २ येथील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर सरचिटणीस महेश मोरे यांच्याकडून करण्यात आली आहे.यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात परिसरातील मान्सूनपूर्व नालेसफाई अद्याप झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास पावसाचे पाणी साचून वस्त्यांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तातडीने नालेसफाईची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अंबिका नगर २ मधील भैय्यासाहेब आंबेडकर चाळ परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण असते. संबंधित ठिकाणी पथदिव्यांची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर तात्काळ पथदिवे बसवावेत, अशीही मागणी करण्यात आली.
महेश मोरे यांच्या विनंतीनुसार हे निवेदन देण्यात आले असून महानगरपालिकेकडून लवकरात लवकर कार्यवाही होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.




















