आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास सब स्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा
कोपरगाव : दिलीप गायकवाड
ग्रामीण भागातील वाढते भारनियमन तातडीने थांबवून विद्यार्थ्यांसाठी खिर्डी गणेश सब स्टेशन परिसरात अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी नाटेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आठ दिवसांनंतर खिर्डी गणेश सब स्टेशनला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू होऊन महिनाभर उलटला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने सोयाबीन, मका आदी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरीतील उपलब्ध पाण्यावर स्प्रिंकलरद्वारे सिंचन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत नाटेगाव, येसगाव, खिर्डी गणेश, अंचलगावसह परिसरात वाढविण्यात आलेल्या भारनियमनामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, शाळा सुरू झाल्याने सततच्या वीजखंडितीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे. त्यामुळे भारनियमनाचा कालावधी कमी करून उच्च दाबाने नियमित वीजपुरवठा करावा. तसेच सब स्टेशन परिसरात २४ तास वीज उपलब्ध असल्याने तेथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर बाळासाहेब रंगनाथ मोरे, गणेश वसंत मोरे, सौरभ वर्पे, अभिजित मोरे, लक्ष्मण मोरे, जालिंदर मोरे, पांडुरंग तांबे, ऋषिकेश मोरे, बापू नरोडे, संदीप शिंदे, सचिन पोळ, मच्छिंद्र मोरे, सोपान मोरे, गणेश मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच नाटेगाव ग्रामपंचायतीनेही भारनियमनाची वेळ बदलून नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.




















