कोपरगांवात सुरक्षिततेची भावना निर्माण करू – प्रभारी अधिकारी रामकृष्ण कुंभार
कोपरगांव, दि.१७ ( दिपक साटोटे )
“कोपरगांव शहरात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाही. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही गय दिली जाणार नाही,” असा ठाम इशारा कोपरगांव पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी अधिकारी रामकृष्ण म. कुंभार यांनी दिला आहे.

कुंभार यांनी नुकताच कोपरगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. या निमित्ताने बहुजन शक्ती न्यूजचे कार्यकारी संपादक दिलीप गायकवाड आणि पत्रकार दीपक साटोटे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले.
या प्रसंगी बोलताना प्रभारी अधिकारी कुंभार म्हणाले, “शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे पोलीस दलाचे प्राथमिक कर्तव्य आहे. पोलिसांवर नागरिकांचा विश्वास वाढावा, यासाठी पारदर्शक आणि कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येक नागरिकाचा सन्मान राखत, कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे कार्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.”
कुंभार,पुढे म्हणाले, “शहरात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य, समाजविघातक कृत्य किंवा अवैध व्यवसाय सहन केला जाणार नाही. गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.”शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही प्रभारी अधिकाऱ्यांनी दिली.”
नवीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या आगमनाने शहरातील जनतेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, पोलीस यंत्रणेबाबतचा विश्वास अधिक दृढ होत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिकांतर्फेही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.
“शहरातील नागरिकांनी सुरक्षिततेचा विश्वास ठेवावा, हे पोलीस विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखता येतो. त्यामुळे जनतेने कोणतीही अडचण असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, आम्ही तत्परतेने मदतीसाठी उपलब्ध आहोत.”असे आवाहन त्यांनी कोपरगावातील जनतेला केले आहे.




















