मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला गती देण्यासाठी रविवार, दिनांक २९ जून रोजी सकाळी १० वाजता चेंबूर पश्चिम येथील पी.एल. लोखंडे मार्गावर मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महाबोधी महाविहारचा ताबा बौद्ध समाजाकडे देण्यात यावा आणि बी.टी. ॲक्ट १९४९ हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी समितीची मागणी आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, मंदिर हिंदू समाजाच्या, मस्जिद मुस्लिम समाजाच्या, चर्च ख्रिश्चन समाजाच्या, तर गुरुद्वारा शीख समाजाच्या ताब्यात असताना, बौद्ध समाजाच्या सर्वात पवित्र असलेल्या महाबोधी महाविहाराचा ताबा अद्याप बौद्ध समाजाकडे नाही, हे गंभीर अन्याय असून तो दूर करणे गरजेचे आहे.
या आंदोलनाचे नियोजन शरद शेळके, प्रवीण बागूल, विनोद पवार आणि आकाश साळवे यांनी केले आहे. विविध बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळीआंदोलना विषयी बोलताना प्रविण बागुल यांनी सांगितले की, “महाबोधी महाविहार हा बौद्ध धर्मीयांचा जागतिक वारसा असून, त्याचा ताबा बौद्ध समाजाकडे असणे ही नैतिक आणि धार्मिक गरज आहे. सरकारने याबाबत त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्ण मानवी साखळी आंदोलन करण्यात येत असून, पुढील टप्प्यात व्यापक जनजागृती आणि आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.




















