मुंबई, दि.१४ ( प्रतिनिधी )
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा आज प्रत्यक्ष ट्रॅकवर उतरली. मिरा-भाईंदर ते दहिसर (पूर्व) या दरम्यानच्या मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात झाली. यावेळी विविध मंत्री, आमदार, अधिकारी आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.
४.४ किमी लांबीच्या या टप्प्यात चार स्थानकांचा समावेश आहे – दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव. विशेष म्हणजे, ही मेट्रो लाईन मुंबईतील पहिला “डबल डेकर” प्रकल्प असून, मेट्रो मार्ग आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत उभारले आहेत.
मेट्रो लाईन-९ मिरा-भाईंदरकरांना पश्चिम उपनगर, अंधेरी, घाटकोपर आणि CSMIA आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडेल. तसेच भविष्यात वसई-विरार व ठाणेशी देखील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात लक्षणीय घट ऊर्जा बचतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुटसुटीत, वेळेत आणि आरामदायक प्रवास.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “ही मेट्रो लाईन मिरा-भाईंदरच्या दृष्टीने परिवर्तन घडवणारी ठरेल. २०२७ पर्यंत संपूर्ण मेट्रो नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात येईल.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, “या प्रकल्पामुळे ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांची मेट्रोशी थेट जोडणी होईल. दरवर्षी ५० ते ६० किमी नवीन मेट्रो सुरू करण्याचा आमचा मानस आहे.”




















