कोपरगाव, दि.१० : दिपक साटोटे
कोपरगाव शहरातील बालाजी आंगण परिसरात उभ्या असलेल्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकची ताडपत्री फाडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ४ हजार ३६० रुपयांचा देशी दारूचा माल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे
तक्रारदार महेश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते चालक म्हणून कार्यरत असून मालवाहक ६ टायर ट्रक क्र. एम.एच. ४१ जी ७१३५ ही गाडी ८ ऑक्टोबर रोजी त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर (कोळपेवाडी) येथून भिंगरी कंपनीचा देशी दारूचा माल भरला होता.
रात्री गाडी थांबवली; सकाळी उघड झाला चोरीचा प्रकार..
फिर्यादी मोरे यांनी सांगितले की, गाडीमध्ये १८० एम.एल.च्या बाटल्यांचे ४०० बॉक्स (बॅच नं. ११२१) आणि ९० एम.एल.च्या बाटल्यांचे २०० बॉक्स (बॅच नं. ११२८) असा माल भरला होता. हा माल श्रीरामपूर येथे डिलिव्हरीसाठी नेण्यात येणार होता. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांनी रात्री गाडी बालाजी आंगण, कोपरगाव येथे रोडच्या कडेला उभी करून घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ६.०० वाजता ते पुन्हा गाडीकडे आले असता, मागील ताडपत्री उचकलेली दिसली. पाहणी केली असता, भिंगरी कंपनीच्या १८० एम.एल. क्षमतेच्या ६५ बॉक्स (३१२० बाटल्या) चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरीस गेलेल्या या मालाची एकूण किंमत २,०४,३६०/- इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी नॅशनल ट्रान्सपोर्टचे मालक शैलेश रावळ यांना बोलावून घटनेची माहिती दिली. नंतर पोलिसांत धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकचे आवरण फाडून दारूच्या पेट्या चोरल्या असाव्यात.या घटनेमुळे दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी रोकडे अधिक तपास करीत आहेत.




















