सायन – सरदारनगर रस्त्याच्या निकृष्ट कामावर मनसेचा संतप्त सवाल
मुंबई, दि.१० : मंगेश म्हात्रे
सायन- सरदारनगर येथील जयशंकर याज्ञीक मार्गाच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला जाब विचारला आहे. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणानंतर अवघ्या महिन्याभरातच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले त्यामुळे पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामावर मनसेने प्रश्न उपस्थित केला आहे.
सरदारनगर आणि प्रतीक्षानगरला जोडणारा जयशंकर याज्ञीक मार्ग हा परिसरातील मुख्य मार्ग आहे. पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होऊन चाळण झाली होती. दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली होती. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर महिनाभरापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते मात्र महिन्याभराच्या आतचं रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले परिणामी पुन्हा डांबरीकरण करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. मनसे विभागाध्यक्ष संजय भोगले यांनी आरोप केला की, “डांबरीकरणाच्या नावाखाली ठेकेदार आणि प्रशासनाने जनतेला चुना लावला आहे. निधी खर्च करूनही रस्त्यांची अशी अवस्था असणे हे भ्रष्टाचाराचे द्योतक आहे.”
मनसे उपविभाग अध्यक्ष विलास अपराध यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “रस्त्यांचा दर्जा सुधारणा करण्यात यावी, पुन्हा खड्डे पडल्यास सरदारनगर आणि प्रतीक्षानगरमधील नागरिकांना सोबत घेऊन ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन छेडले जाईल.”
प्रशासनाने या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी असे मनसे शाखाध्यक्ष लवू यांनी केली आहे.




















