ठाणे,दि.१.अजय मगरे
खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्श आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे यांनी सांगितले की, १७व्या शतकात धार्मिक अत्याचाराच्या काळात काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादूर यांनी दिल्लीतील चांदणी चौकात शिरच्छेद स्वीकारला, पण अन्यायासमोर झुकले नाहीत. “त्यांच्याकडे सत्ता नव्हती, पण सत्य, साहस आणि करुणा होती. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हटले जाते,” असे ते म्हणाले.
गुरुजींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत शिंदे यांनी सामाजिक ऐक्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला.




















